Jnana Prabodhini Prashala

📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.    

मिलिंद नाईक: प्रयोगांच्या क्षितिजावर उमललेले धडपडे नेतृत्व

कोविडचे भरमसाठ आकडे चीनमधून येत होते. एक विचारप्रवाह असा होता की, हा व्हायरस भारतामध्ये येणे शक्य नाही. त्यात येऊ घातलेला उन्हाळा, त्यामुळे तर हा व्हायरस टिकणे अशक्यच आहे; सगळेच गाफील होते. पण एक माणूस मात्र यामध्ये गाफील नव्हता. कारण त्याने खूप लहानपणापासून एक ओळ नित्याने म्हटलेली होती, ती म्हणजे—‘अभ्यास देशस्थितीचा समतोल चालवू’. आणि त्या अभ्यासाच्या बळावर, ‘पुढे काय प्रश्न येऊ शकतात आणि त्यावर आपले उत्तर काय असावे?’, याचे चिंतन आणि प्रत्यक्ष कृती याबाबत आता विचार चालू होता.
सगळे लोक पूर्णतः निद्रित असताना ही व्यक्ती मात्र रचना बसवत होती. जर शाळा बंद झाल्या तर काय होईल? शाळा बंद झाल्या तर वर्गातल्या मुलांचे येणे बंद होईल, परंतु मुलांचे शिक्षण बंद नाही झाले पाहिजे. त्याने बैठकांवर बैठका घ्यायला सुरुवात केली, चिंतन करायला सुरुवात केली, विचार करायला सुरुवात केली आणि प्रक्रिया बसवायला सुरुवात केली. त्याने तंत्रज्ञान शिकून घेतले. आणि लॉकडाऊनची घोषणा झाली, बहुधा तो शुक्रवार असावा. शनिवारचा दिवस गेला आणि सोमवारपासून शाळा ‘फुल फ्लेज’ (Full-fledged) ऑनलाईन सुरू झाली, फक्त एका दिवसाच्या गॅपने! शिक्षकांना पूर्ण माहीत होते आपण काय करायचे, विद्यार्थ्यांना माहीत होते आपण काय करायचे, पालकांना माहीत होते हे कसे करायचे; पूर्ण शाळा ऑनलाईन झाली.

मुलांचे अवांतर पुस्तकांचे वाचन झाले पाहिजे, यासाठी घरोघरी गाडी करून पुस्तके पाठवण्यात आली. मुलांच्या बुद्धीला जशी चालना मिळायला पाहिजे, तशीच बुद्धीबरोबर त्यांच्या हस्तकौशल्याला आणि इतर कौशल्यांनाही चालना मिळाली पाहिजे; म्हणून ‘धडपड प्रयोगशाळेतले’ किट तयार करण्यात आले आणि मुलांना ते देण्यात आले.

ज्या वेळी मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज, मोठमोठ्या शाळा, कॉर्पोरेट शाळा, मातब्बर संस्थांच्या आणि राजकीय महर्षींच्या शाळा बंद पडलेल्या होत्या; त्या वेळी मात्र एक शाळा अविरत चालू होती, ती म्हणजे ‘ज्ञान प्रबोधिनी’. आणि याची सगळी रचना लावणारे होते—ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य मिलिंद नाईक.
ज्ञान प्रबोधिनी ही एका विशिष्ट उद्देशाने सुरू झालेली शाळा आहे. तो उद्देश जर साध्य झाला नाही, तर शाळा चालवण्याला काय अर्थ आहे? “त्या उद्देशाशी आम्ही कॉम्प्रमाईज (तडजोड) करणार नाही, त्या ध्येयाशी कॉम्प्रमाईज करणार नाही.” नेमका याच वेळी काही विघ्नसंतोषी लोकांनी प्रबोधिनीच्या या पद्धतीवरच आक्षेप घेतला.

नवीन प्रवेश झालेले होते आणि प्रवेशावर म्हणजेच नवीन तुकडी सुरू करण्यावर शासकीय बंदी घालण्यात आली. ‘मुलांचे प्रवेश नाकारून, प्रवेश रद्द करून त्यांना परत आधीच्या शाळेत पाठवावे’, असा एक मतप्रवाह होता. मिलिंदच्या पाठीशी मानसिक आणि बौद्धिक बळ देणारे प्रबोधिनीचे सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ खंबीरपणे उभे होते, परंतु प्रत्यक्ष पालकांना सामोरे जायला मिलिंदला स्वतःला जावे लागणार होते. मिलिंदने अतिशय खंबीरपणे त्या पालकांचा सामना केला (फेस केले). प्राचार्य होऊन केवळ दोनच वर्षे झाली होती, पण खंबीरपणे लढून तो या लढ्यामध्ये यशस्वी झाला आणि प्रबोधिनी यशस्वी झाली.

असे एक नाही, अनेक प्रसंग आहेत, ज्या वेळी मिलिंदचे धैर्य एकदम पणाला लागले होते.

मिलिंदची आणि माझी दोस्ती जवळपास ३३ वर्षे जुनी आहे. मिलिंदला प्रशालेमध्ये काम सुरू करून आता २९ वर्षे झाली आहेत.
स्वामी विवेकानंद म्हणतात, “Take up one idea. Make that your idea to your life. Think of it, dream of it, live on that idea. Leave every other idea alone. This is the way to success.”

तैत्तिरीय उपनिषदातला वारुणीचा पुत्र भृगु याला ब्रह्मजिज्ञासा होते आणि ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी तो एक-दोन नाही, तब्बल ६० वर्षे तपश्चर्या करतो—‘तपो ब्रह्मेति’. एखादा विषय घ्यावा आणि त्याने भारून जावे, त्याच्या पाठीमागे असे लागावे की—”One Life, One Mission”. अशी ही भारतीय ज्ञानग्रहणाची प्रक्रिया आहे. मिलिंद त्या प्रक्रियेचाच एक घटक आहे, पाईक आहे. त्याची जवळपास अडीच दशकांची, म्हणजेच दोन-अडीच तपांची तपश्चर्या झालेली आहे आणि पुढेही ती अशीच चालू राहणार, याबद्दल शंका नाही.
मिलिंद हे नाव आठवल्याबरोबरच ३३ वर्षांपूर्वीचा मिलिंद डोळ्यांसमोर येतो.

अण्णासाहेब हजारेंचे आंदोलन आणि त्यांची (अण्णासाहेबांची) जबाबदारी ही ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांकडे होती. अण्णा प्रबोधिनीचे उपाध्यक्ष होते. ती जबाबदारी माझ्यावर आणि मिलिंदवर सोपवण्यात आलेली होती. आमच्या दोघांच्या वयामध्ये तीन-चार वर्षांचे अंतर होते, पण मिलिंदने ज्या प्रेरणेने आणि ज्या ताकदीने मला त्या प्रक्रियेमध्ये मदत केली, सोबत केली, ती अफलातून होती.
आगे तो शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्णपणे उतरला, तर मी विवेकानंद केंद्राच्या मार्गाने निघून गेलो. मी जेव्हा परत आलो, तेव्हा मिलिंदला राहवले नाही आणि तो अंबाजोगाईला आला. अंबाजोगाईत त्याने माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या; त्या वेळी त्याच्या मनात एकच ध्यास होता की, ज्ञान प्रबोधिनीचे एक ‘बी.एड. कॉलेज’ असले पाहिजे. सदैव काहीतरी इच्छा मनात ठेवून—’प्रबोधिनीचे हे असले पाहिजे, प्रबोधिनीचे ते असले पाहिजे, प्रबोधिनीचे असे झाले पाहिजे, प्रबोधिनीचे तसे झाले पाहिजे’—असा सतत चिंतन करणारा हा मिलिंद!

त्यानंतर प्रबोधिनीचे पहिले शिबिर जेव्हा अंबाजोगाईत झाले, त्या वेळी पूर्ण सात दिवस, क्षणोक्षणी प्रत्येक गोष्ट नेमकेपणाने आणि चोख लावून करणारा मिलिंद माझा सहकारी होता.

पुढे ‘ग्रामीण प्रज्ञा विकास योजना’ असू द्या, किंवा ज्ञान प्रबोधिनीची ‘प्रबोधशाळेतली प्रयोगशाळा’ सेट करणे असू द्या, अशा अनेक गोष्टींमध्ये मिलिंदचे सहकार्य अफलातून होते. प्रशालेमध्ये शिकणारा, प्रत्येक परिस्थितीत सोबत असणारा सहकारी, अण्णांच्या आंदोलनामध्ये सोबत असलेला मित्र आणि ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाईची उभी करत असताना सुरुवातीचा सगळ्यात मोठा आधार असणारा प्रबोधक—असा हा आमचा मिलिंद मंदार नाईक!

मूळचे बेळगावचे असलेले मिलिंदचे कुटुंब वडिलांच्या सेंट्रल एक्साईजमधील नोकरीमुळे महाराष्ट्रात (पुण्यात) आले. बालपण प्रभात रोडवरील अवघ्या दोन खोल्यांच्या घरात गेले, पण तिथूनच त्याच्या पंखांना व्यापक ध्येयांचे बळ मिळाले.
बालशिक्षण मंदिर आणि त्यानंतर ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत त्याचे शिक्षण झाले. सुरुवातीपासूनच त्याचा स्वभाव एखाद्या झऱ्यासारखा प्रवहमान होता. कधीही शांत न बसणे, सतत काहीतरी नवीन करून पाहणे, हा त्याचा उपजत पिंड होता.

संघटनात्मक कौशल्य आणि जनसंग्रह

मिलिंदच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे ‘माणसं जोडण्याची कला’. प्रबोधिनीच्या संस्कारांमुळे त्याची संघटन वृत्ती कॉलेज जीवनात अधिक बहरली. गरवारे कॉलेजमध्ये असताना त्याने ‘प्रचिती’ हा विद्यार्थ्यांचा गट सुरू केला. कॉलेजमध्ये तो सायन्सला होता. आपल्या अफाट उत्साहाने त्याने सर्वांना एकत्र आणले. या गटाच्या माध्यमातून त्याने दुसऱ्याच वर्षी सामाजिक प्रश्नांवर व्याख्यानमाला आयोजित केली होती, जी त्याच्यातील नेतृत्वगुणांची प्रचिती देणारी होती.

त्याची हीच ऊर्जा स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्येही पाहायला मिळाली. तिथल्या वेगवेगळ्या वयोगटांतील विद्यार्थ्यांना त्याने प्रबोधिनीशी जोडले आणि त्यांना समाजकार्याची ओळख करून दिली.

संशोधनाची ओढ आणि निस्पृह वृत्ती

एम.एस्सी. (M.Sc.) च्या शिक्षणासाठी मिलिंद प्रवरानगरला गेला. तिथेही तो अत्यंत सक्रिय विद्यार्थी म्हणून नावारूपास आला. कॉलेजमध्ये पुरेशी साधने नसतानाही, हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी तो श्रीरामपूर किंवा पुण्यात चकरा मारत असे. या जिद्दीमुळेच एम.एस्सी.च्या द्वितीय वर्षात असतानाच त्याचा शोधनिबंध ‘सिंथेटिक केमिस्ट्री’ (Synthetic Chemistry) या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.

त्याच्या या गुणवत्तेमुळे त्याला तैवानमधून थेट पीएच.डी. (Ph.D.) ची सुवर्णसंधी चालून आली होती. पण मिलिंदका ध्यास वेगळा होता. पैशांबद्दल आणि मोबदल्याबद्दल तो सुरुवातीपासूनच पूर्णपणे ‘निरीच्छ’ होता. त्याने ती आंतरराष्ट्रीय ऑफर नाकारली आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला.

सेवेचा वसा आणि मार्गदर्शकांचा प्रभाव

त्याच्या या प्रवासात अनेक दिग्गजांचे संस्कार कारणीभूत ठरले. प्रबोधिनीच्या शालेय वातावरणात त्याच्यावर गिरीशराव आणि विशेषतः विवेकराव कुलकर्णी यांचा प्रचंड प्रभाव होता. मिलिंदचे कार्य केवळ शाळेपुरते मर्यादित नव्हते.

• त्याने अशोक विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रबोध दल’ चालवले.
• लोणावळ्यातील ‘सेव्ह द चिल्ड्रन कॅनडा’च्या बालग्रामात अनाथ मुलांसाठी त्याने सलग तीन वर्षे शनिवार-रविवार देऊन काम केले.

१९९३-९४ च्या सुमारास सुरू झालेला हा प्रवास पुढे १९९७ मध्ये एका शिक्षकाच्या रूपाने वर्गात पोहोचला. पण हे शिक्षकी पेशाचे वर्तुळ केवळ शाळेच्या चार भिंतींपुरते मर्यादित नव्हते. ‘ग्रामीण प्रज्ञा विकास’ प्रकल्पाच्या माध्यमातून या ध्येयवेड्या शिक्षकाने ग्रामीण भागातील गुणवत्तेला आकार देण्याचे एक व्रतच हाती घेतले होते.

त्या काळात त्याच्याकडे एक स्कूटर होती. आळवड्यातून दोन दिवस, कधीही न चुकता, ती स्कूटर भोरमधील ‘रावडी’ आणि वेल्ह्याजवळील ‘पाबे’ या गावांच्या दिशेने धावायची. ऊन-पाऊस, खडतर रस्ते कशाचीही तमा न बाळगता, मुलांच्या भविष्यासाठी त्याचे हे पाय कधीच थबकले नाहीत.

हक्काचा माणूस

त्याचा स्वभावच असा की, तो जिथे गेला तिथे त्याने माणसांची मने जिंकली. शाळेतील सर्व शिक्षकांसाठी तो अत्यंत लाडका आणि आदरणीय होता. पण त्याचे काम केवळ वर्गात शिकवण्यापुरते नव्हते. मुलांच्या थेट घरी जाऊन त्यांच्या पालकांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे हा त्याच्या दिनक्रमाचा भाग होता. केवळ अभ्यासापलीकडे जाऊन मुलांमध्ये ‘स्वयंअध्ययन’ आणि प्रबोधिनीच्या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी त्याने अनेक शिबिरे घेतली. दिवसा शाळेत मुलांशी संवाद साधायचा आणि संध्याकाळी संपूर्ण गावात फिरून प्रत्येकाच्या सुख-दुःखात सामील व्हायचे, हा त्याचा अनोखा स्वभाव होता.
बीज रोविले… वृक्ष बहरले!
त्याच्या या निस्वार्थी प्रयत्नांतून अनेक हिरे घडले. आज भलेही त्या कामाला २०-२५ वर्षे झाली असतील, पण त्याने लावलेली ती रोपे आज उत्तुंग वृक्ष बनून समाजाची सेवा करत आहेत. त्यातील काही प्रातिनिधिक उदाहरणे म्हणजे त्याच्या कार्याची खरी पावती:

• राम रेणुसे (पाबे): पाबे गावातून आलेला हा मुलगा प्रबोधिनीच्या संस्कारात वाढला. सुरुवातीला संगणक कर्मचारी म्हणून रुजू झालेला राम, आज आपल्या अंगभूत उद्योगी वृत्तीमुळे आणि ‘विज्ञान आश्रम पाबळ’मधील शिक्षणामुळे संगणक हार्डवेअरच्या कामात उत्तम प्रकारे सेटल झाला आहे.
• सचिन ओव्हाळ (रावडी): रावडी गावचा सचिन आज प्रशालेमध्ये सर्व कर्मचारी सदस्यांचा प्रमुख म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि कुशलतेने काम पाहत आहे.
• लीना ओव्हाळ (रावडी): कौटुंबिक परिस्थिती बेताची असतानाही, तिच्यातील चमक ओळखून या शिक्षकाने (मिलिंदने) तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली. पुढे याच मार्गदर्शनातून लीनाने स्पर्धा परीक्षा दिली आणि आज ती एक उत्तम अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
माणुसकीचा अखंड झरा

ज्यांना शिक्षणासाठी पैशांची नड होती, त्यांना आर्थिक मदत करणे, ग्रामीण भागातील मुलांना पुण्यात आणून त्यांच्या राहण्याची-खाण्याची सोय स्वतःच्या घरी किंवा नातेवाईकांकडे करणे, यात त्याला कधीच परकेपणा वाटला नाही. आज इतक्या वर्षांनंतरही, जेव्हा तो त्या भागात जातो, तेव्हा जुने शिक्षक आणि विद्यार्थी आदराने आणि मायेने त्याला बोलावतात. काळ बदलला, वर्षे सरली, पण त्याने जोडलेली ही माणसे आणि आपुलकीचे संबंध आजही तितकेच घट्ट आणि ताजे आहेत. हेच एका खऱ्या शिक्षकाचे आणि समाजसेवकाचे सर्वात मोठे संचित आहे!

तीन महत्त्वाच्या लढाया आणि ‘पाषाण’चे स्वप्न

मिलिंदच्या प्राचार्यपदाच्या कारकिर्दीत एकाच वेळी तीन मोठ्या आघाड्यांवर संघर्ष सुरू होता. पहिली लढाई होती प्रशालेवर आलेले कायदेशीर संकट (कोर्ट केस), दुसरी लढाई नव्या शैक्षणिक धोरणाची पायाभरणी आणि तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ‘पाषाण’च्या जागेचा प्रश्न. पाषाणच्या जागेवर अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय बंधने होती. ती सर्व बंधने शिथिल करून तिथे प्रत्यक्ष बांधकाम करण्याची परवानगी मिळवणे, हे अत्यंत जिकिरीचे काम होते. अनेक वर्षांची ही कायदेशीर झुंज आणि मुंबईच्या अविरत वाऱ्या केल्यानंतर, अखेर दोन वर्षांपूर्वी या संघर्षाला यश आले. तिथे कामाची एक नवी आशा निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या मार्गात अजूनही जे दैनंदिन अडथळे येतात, त्याविरुद्ध मिलिंदची अविरत लढाई आजही सुरू आहे.

साहित्यिक योगदान आणि वर्तमानपत्रातील लेखन

त्याचे वैचारिक आणि साहित्यिक योगदानही तितकेच व्यापक आहे. प्रशालेत रुजू झाल्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षांतच, म्हणजेच २००४ च्या ‘वैज्ञानिक जागरूकता वर्षा’त त्याने ‘सकाळ’च्या ‘बालमित्र’ पुरवणीमध्ये ‘दैनंदिन आयुष्यातील विज्ञान’ हे सदर चालवले. त्याच वेळी त्याने ‘वैज्ञानिक प्रश्नोत्तरांवर’ आधारित एक स्वतंत्र सदरही चालवले होते. त्याचे हे शैक्षणिक आणि विज्ञानविषयक लेखन अविरत सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने ‘करिअर’ या विषयावर वर्षभर लेखन केले, तर चालू वर्षात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’तील (NEP) विविध शैक्षणिक विचारांवर आधारित त्याची अभ्यासपूर्ण लेखमाला वर्तमानपत्रातून नियमितपणे प्रसिद्ध होत आहे. याशिवाय त्याने तंत्रज्ञान आणि प्रकल्प पद्धतीच्या शालेय पाठ्यपुस्तकांचेही लेखक (Author) म्हणून लेखन केले आहे.

८० कार्यकर्त्यांचे बळ आणि ‘पालक संघाची’ अभिनव उभारणी

आज प्रशालेमध्ये ३० पूर्णवेळ शिक्षक आणि १० शिक्षकेतर कर्मचारी आहेत. याशिवाय अर्धवेळ व तासांनुसार त्याने येणारे शिक्षक धरले तर ६५ शिक्षकांचा आणि एकूण ८० कार्यकर्त्यांचा मोठा चमू मिलिंदच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या संपूर्ण प्रवासात त्याने ‘पालक संघाची’ केलेली उभारणी अत्यंत कौतुकास्पद आहे. पूर्वी पालकांना शाळेपासून थोडे दूर ठेवण्याची पद्धत होती, पण मिलिंदने ती व्यवस्था बदलून पालकांना प्रशालेचे अविभाज्य घटक बनवले. आज हा पालक संघ केवळ नावाला उरलेला नाही, तर त्यांचे ‘गडकिल्ले संवर्धन’, ‘सहली’ आणि ‘अभिव्यक्ती’ सारखे विविध गट कार्यरत आहेत. आजच्याच दिवशी या पालक संघाने ‘अभिव्यक्ती’ अंतर्गत बसवलेले एक सुंदर नाटक सादर केले आहे, जे गेल्या ३-४ वर्षांतील त्यांच्या सक्रियतेचे उत्तम उदाहरण आहे.
तंत्रज्ञानाची क्रांती आणि शैक्षणिक प्रयोग

प्रशालेमध्ये तंत्रज्ञान (Technology) खूप लवकर आणण्याचे दूरदृष्टीचे काम मिलिंदने केले. विचार मांडणे सोपे असते, पण ते प्रत्यक्ष कृतीत आणणे कठीण असते; मिलिंदने संगणक प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रशालेच्या दैनंदिन कामकाजात यशस्वीपणे रुजवले. त्याच्या काळात प्रशालेमध्ये केवळ प्रयोग झाले नाहीत, तर त्या प्रयोगांना एक निश्चित दिशा (‘स्ट्रीमलाईन’) देण्यात आली. इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी त्याने सुरू केलेली ‘स्तर पद्धती’ (Ability-based Learning) हा याचाच एक भाग आहे. विद्यार्थ्याला ज्या पातळीवरून समजते, तिथून त्याला शिकवण्याची ही पद्धत प्रशालेच्या गुणवत्तेत भर घालणारी ठरली.

तंत्रज्ञान, कला आणि अभिव्यक्तीचा त्रिवेणी संगम

प्रबोधिनीमध्ये अनेक प्रयोग वर्षानुवर्षे चालत आले आहेत, परंतु त्यांना एक सुविहित रूप (Streamline) देण्याचे मोठे श्रेय मिलिंदकडे जाते. विशेषतः ‘कला शिक्षण’ ज्याला आपण ‘अभिव्यक्ती’ म्हणतो, त्याची एक अत्यंत उत्तम व्यवस्था त्याने बसवली. केवळ शिकणे पुरेसे नाही, तर आपण काय शिकलो हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणे महत्त्वाचे असते, यावर त्याचा ठाम विश्वास होता. म्हणूनच दरवर्षी होणाऱ्या ‘अभिव्यक्तीच्या प्रात्याक्षिकाने’ नेहमीच एक नवी उंची गाठली. केवळ प्रयोगांच्या पातळीवर न रेंगाळता, त्याला एक शाश्वत स्वरूप देण्याचे कौशल्य मिलिंदने दाखवले. त्याचप्रमाणे, ‘अग्रणी योजने’च्या माध्यमातून मुलांमधील ‘लीडरशिप’ वाढवण्यासाठी त्याने सखोल अभ्यास केला. मुलांचे नेतृत्वगुण केवळ पुस्तकी न राहता, ते प्रत्यक्ष जगण्यात उतरावेत यासाठी त्याने अत्यंत योजनाबद्ध आखणी केली.

‘सर्वंकष मूल्यमापन’

शिक्षणाच्या क्षेत्रात मिलिंदने केलेले दोन प्रयोग मैलाचे दगड ठरले. पहिला म्हणजे ‘अभिमित्र’ (Mentor) ही संकल्पना. प्रत्येक वर्गाला एक मार्गदर्शक शिक्षक देणे, जो सलग ६ वर्षे त्या मुलांच्या सोबत असेल, त्यांच्या वाढीचे टप्पे अनुभवेल आणि त्यांच्याशी कायम संवादात राहील. या ‘मेंटॉर-मेंटी’च्या नात्याने मुलांच्या जडणघडणीला एक भावनिक आणि बौद्धिक आधार दिला. दुसरा महत्त्वाचा प्रयोग म्हणजे ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’. गुणपत्रिकांच्या पलीकडे जाऊन मुलांच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन घडवणारे ८ पॅरामीटर्स त्याने निश्चित केले. या वर्षाच्या शेवटी दिल्या जाणाऱ्या रिपोर्टमधील २४ पाने ही मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या सामाजिक व भावनिक विकासाचे सविस्तर वर्णन (Description) असायची. हा प्रयोग बाहेरच्या जगात सुरू होण्याच्या कित्येक वर्षे आधी मिलिंदने प्रबोधिनीमध्ये यशस्वी करून दाखवला होता.

धडपड प्रयोगशाळा (Maker’s Space)

“बुद्धिमान मुलांची केवळ बुद्धीच चालून चालत नाही, तर त्यांचे हातही चालले पाहिजेत,” या विचारातून मिलिंदने ‘धडपड प्रयोगशाळा’ सुरू केली. जागेच्या टंचाईपासून ते साधनसामग्री गोळा करण्यापर्यंत अनेक अडचणींशी लढा देत त्याने ही प्रयोगशाळा उभी केली. आज बाहेरच्या जगात ज्याला ‘अतल टिंकरिंग लॅब’ किंवा ‘मेकर्स स्पेस’ म्हटले जाते, याची पायाभरणी मिलिंदने खूप आधीच केली होती.

एका कर्मयोग्याचा कडक दिनक्रम

मिलिंदची जीवनशैली एखाद्या व्रतस्थासारखी आहे. त्याचा संपूर्ण दिवस अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यग्र असतो: सकाळी साडेपाच वाजता उठून स्वतःचा व्यायाम, उपासना आणि योगासने करणे हा त्याच्या दिवसाचा पाया असतो. त्यानंतर सकाळी आठ वाजता तो प्रशालेत पोहोचतो. तिथून रात्री साडेआठ, नऊ वाजेपर्यंत सलग साडेतेरा ते चौदा तास प्रशालेचे काम सुरू असते. रात्री घरी परतल्यावरही पुन्हा व्यायाम, वाचन आणि पुढील दिवसाचे नियोजन चालते. सकाळी ५:३० ते रात्री ११:०० असा त्याचा संपूर्ण दिवस पॅक असतो

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटलेला ठसा

मिलिंदचे कार्य केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित राहिले नाही. त्याने शालेय प्रयोगांचे दस्तऐवजीकरण (Documentation) and संशोधन यावर विशेष भर दिला. फिनलंड, मलेशिया, जपान यांसारख्या देशांमध्ये जाऊन प्रबोधिनीच्या प्रयोगांचे पेपर्स शिक्षकांनी सादर केले. सीबीएसई (CBSE) च्या मुख्याध्यापकांसमोर ‘Leadership in Schools’ या विषयावर सादरीकरण केले. आज पाषाणच्या शाळेच्या संदर्भात ११ वी-१२ वी सुरू करणे, निवासी संख्या वाढवणे, ‘कम्युनिटी सेंटर’च्या माध्यमातून आसपासच्या लोकांना जोडणे अशी अनेक मोठी स्वप्ने त्याच्या डोळ्यांत आहेत. प्राचार्य म्हणून दीर्घकाळ काम करताना त्याने केवळ शाळा चालवली नाही, तर अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. मिलिंद नावाचा हा ‘धडपड्या’ आणि प्रयोगांचे नवनवे क्षितिज शोधणारा कार्यकर्ता शिक्षण क्षेत्राला नेहमीच प्रेरणा देत राहील.

@all
@Milind Naik Sir Jpp

Scroll to Top